महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासंदर्भात निर्माण झालेल्या गतिरोधाला (deadlock) आज संध्याकाळी नाट्यमय वळण लागले. काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आतापर्यंत आक्रमक असलेल्या शिवसेनेने (Shiv Sena) एक पाऊल मागे घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सेनेने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. पण, त्यासाठी नवीन अट पुढे केली आहे. भारतीय जनता पार्टीने (BJP) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याऐवजी बहुजन समाजाच्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी बसवावे, अशी अट सेनेने घातल्याने भाजपपुढील अडचण वाढली आहे.
सेनेला मुख्यमंत्री पद द्यायचे नाही, या मुद्दयावर देवेंद्र फडणवीस ठाम राहिल्याने राज्यातील सत्ता स्थापन करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. विधानसभा निवडणूक निकाल लागून दहा दिवस झाले तरी राज्यात कोणाची सत्ता येईल याबाबत अनिश्चितता आहे.
सेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्याकडे 175 चे संख्याबळ आहे असा दावा केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्तेसाठी सेनेसोबत जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. तर कॉंग्रेसमधील पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि अन्य एक गट शिवसेना सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचे समर्थन करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे पक्षात चैतन्य निर्माण झाले आहे. अशा वेळी 2014 च्या चुकीची पुनरावृत्ती केल्यास पक्षाला त्याचा फटका बसेल आणि विश्वासार्हता संपेल. त्यामुळे भाजप-सेनेने काहीही तडजोड करावी आणि सत्ता स्थापन करावी, आम्ही सोबत जाणार नाही, असे राष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.
दरम्यान, भाजप-सेना चर्चेतुन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा (Amit Shah) यांना बाजूला सारले असून ही जबाबदारी कार्याध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda) यांच्याकडे सोपवली आहे. सेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शहा आणि फडणवीस यांच्याशी चर्चा करायला तयार नाहीत. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मध्यस्थी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सेना-भाजप मधील गतिरोध वाढला आहे.
ही कोंडी फोडण्यासाठी आज सेनेने मागणीचे एक पाऊल मागे घेतांना चर्चेसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. पण, हा पुढाकार घेतांना सेनेने भाजपपुढे अट ठेवली आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नको. त्याऐवजी बहुजन समाजाचा नेता मुख्यमंत्री व्हावा. या मोबदल्यात सेना उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार आहे, असे सूत्रांनी दावा केला आहे.
ही अट ठेवून सेनेने एकाच वेळी ब्राम्हण समाजातील फडणवीस आणि मराठा समाजातील नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या दोघांना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाद केले आहे. सेनेच्या नेत्याने दावा केला की, फडणवीस यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड होण्याच्या आधीच्या दिवसापर्यंत सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचे नाव चर्चेत होते.
नागपूरातील सूत्रांनी दावा केला आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही (RSS) फडणवीस यांना बदलावे या पक्षातर्गत चर्चेला संमती दिली आहे. नागपूरकर सूत्राचा दावा खरा ठरल्यास फडणवीस यांच्या जागी अन्य नेत्यांची निवड करून सत्ता स्थापनेत निर्माण झालेला अडथळा दूर करून भाजप-सेनेचे सरकार सत्तेवर येऊ शकेल.
उपमुख्यमंत्री पद स्वीकारतो, फडणवीस नको – सेनेची नवी अट?
Subscribe to TheNews21
Stay Ahead with Independent Journalism
Investigations, political analysis and major national and global stories delivered directly to your inbox.


